सरकारने दिवाळीच्या तोंडावर महागाई केली - अजित पवार
दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका उडालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महागाईविरोधात आंदोलने सुरू आहेत. सर्वसामान्य जनतेला जगण्याचा अधिकार आहे की नाही? योग्य त्या भावात जीवनावश्यक वस्तू सर्वसामान्यांना मिळाल्या पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. या सर्व गोष्टींना तिलांजली देण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करत आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य गोरगरिबांचे कंबरडे मोडले आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.
दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बाणेर-बालेवाडी-सूस व म्हाळुंगे यांच्या वतीने बाणेर येथे दिवाळी सरंजाम वितरण विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते झाले; त्या वेळी पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, शिंदे आणि फडणवीस सरकार हे शेतकरीविरोधी सरकार आहे. रोज राज्यामध्ये तीन ते चार शेतकरी आत्महत्या करत आहेत, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. बेरोजगारी व महागाईवरून दुसरीकडे लक्ष वळवून काहीतरी तिसरीच घोषणा करण्याचे प्रयत्न हे शिंदे-फडणवीस करत आहे. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसात या दोन्ही स्मार्ट सिटी पाण्यामध्ये तरंगताना राज्याने पाहिले आहे. या पावसात शहराचा विकास वाहून गेला असे म्हणण्याची वेळ आली आहे, याचा विचार करावा.
या वेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक बाबूराव चांदेरे, मारूतराव धनकुडे, राज्यसभा खासदार अॅड. वंदना चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी महापौर अंकुश काकडे, ग्राहक पेठचे सूर्यकांत पाठक, सुनील चांदेरे, ज्ञानेश्वर तापकीर, मंगलदास मुरकुटे, दिलीप मुरकुटे, चंद्रकांत जाधव, रोहिणी चिमटे, ज्योती सूर्यवंशी, सुहास भोते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते...




Comments (0)
Facebook Comments (0)